कुंकळळी, दि. १६ : गोमंतकाच्या अस्तित्वासाठी, धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्याच्या संकल्पनेसाठी १५८३ मध्ये कुंकळळीच्या महानायकांनी दिलेल्या बलिदानाला इतिहासात तोड नाही. त्यांच्या त्यागामुळेच गोमंतकीय समाज आपली संस्कृती, धर्म आणि अस्मिता जपू शकला, असे प्रतिपादन समाजकल्याण मंत्री सुभाष फळ देसाई यांनी केले.
राज्य सरकारतर्फे आयोजित कुंकळळी महानायकांच्या ४४३ व्या स्मरणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास (दाद) देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर, गृह खात्याचे अधिकारी तुषार हळणकर, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक तिक्कम सिंग, कुंकळळी महानायक ट्रस्टचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स, कुंकळळी नगरपालिकेचे प्रशासक विकास कांबळी, मुख्याधिकारी राजेश साखळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी सोळा महानायकांना पुष्पांजली अर्पण केली. तसेच पोलीस बँड पथक आणि पोलीस दलाने विशेष संचलन करून महानायकांना मानवंदना दिली.
सुभाष फळ देसाई म्हणाले की, ४४३ वर्षांपूर्वी अत्याचारी पोर्तुगीज सत्तेला आव्हान देण्याचे धाडस कुंकळळीच्या शूर वीरांनी दाखविले. धर्मांतराच्या कटाविरोधात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वधर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी संघर्ष केला. पोर्तुगीजांनी शांतता चर्चेच्या बहाण्याने कपटकारस्थान रचून कुंकळळीच्या पंधरा महानायकांची हत्या केली. त्या बलिदानाची आठवण म्हणून हा स्मरणदिन साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ध्वज फडकवण्यापूर्वीच कुंकळळीच्या महानायकांनी शौर्य आणि स्वाभिमानाचा आदर्श घालून दिला होता. पोर्तुगीजांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, मूर्तींची विटंबना केली, धर्मांतराचा प्रयत्न केला आणि जनतेवर अत्याचार केले. मात्र या सर्व संकटांवर मात करून गोमंतकीयांनी आपला धर्म, संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवली, हेच या भूमीचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
पूर्वजांकडून मिळालेल्या संस्कृतीचे आणि भूमीचे रक्षण करणे आपले कर्तव्य – युरी आलेमाव
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या भाषणात कुंकळळीच्या महानायकांचा इतिहास हा गोव्याच्या स्वाभिमानाचा इतिहास असल्याचे सांगितले. “पूर्वजांकडून मिळालेल्या संस्कृतीचे, भूमीचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे प्रत्येक गोमंतकीयाचे कर्तव्य आहे. कुंकळळीच्या महानायकांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय मातृभूमीसाठी प्राणार्पण केले. हा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा असून तो शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासाठी योगदान देता आले, हे माझे भाग्य आहे,” असे ते म्हणाले.
कुंकळळीचा लढा हा महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाच्या तब्बल तीनशे वर्षे आधी पोर्तुगीज सत्तेविरोधात उभ्या राहिलेल्या असहकार चळवळीचे उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी आजही गोव्यात जनता आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याची खंत व्यक्त केली. जनहिताच्या विरोधातील निर्णय सरकारने टाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास (दाद) देसाई यांनीही विचार व्यक्त केले. बालभवन केंद्र आणि कुंकळळी युनायटेड उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
विविध पुरस्कारांचे वितरण
स्मरणदिनानिमित्त कुंकळळी महानायक ट्रस्ट आणि कुंकळळी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक संतोष देसाई आणि कुंकळळी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप देसाई यांना ‘कुंकळळी श्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
तर सेवानिवृत्त प्राचार्य राजीव देसाई, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी सायरोज देसाई आणि शिक्षिका एलबा नोरोन्हा यांना ‘कुंकळळी ज्योती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, पीएचडी आणि डॉक्टरेट पदवी संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





