विनाशकारक वृत्तीचा बिमोड करण्याचे राखणदारांना आवाहन
गांवकरी, दि. १७ (प्रतिनिधी)
सांतआंद्रे मतदारसंघात ठिकठिकाणी मेगा प्रकल्पांच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. तक्रारी व निवेदने सादर करूनही काहीच कारवाई केली जात नाही. हीच परिस्थिती राज्यभरात सुरू असल्याने त्याचा निषेध म्हणून आरजीपी पक्षाने आज पाटो-पणजी येथील नगर नियोजन खात्याच्या गेटसमोर पिंडदान करून अनोखे आंदोलन छेडले. यापुढे न्यायालयीन लढ्यातूनच टीसीपीला अद्दल घडवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर मतदारसंघातील बेकायदा गोष्टींवरून बरेच आक्रमक बनले आहेत. बांबोळी किनाऱ्यावरील हॉटेल ग्रँड हयातचे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून सुरू असलेल्या कामाविरोधात आंदोलन छेडल्यानंतर हे काम बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले. अशाच बांबोळीतील एका रिसॉर्टच्या कामाविरोधातही त्यांनी दंड थोपटले आणि नगर नियोजन खात्याकडून या कामाची पाहणी करण्यात आली. नगर नियोजन खात्यात परत एकदा धडक देऊन जाब विचारण्याच्या तयारीत असता आज पोलिस फौजफाट्यासह गेट बंद करून त्यांना रोखण्यात आले. आमदार बोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क साधून याचे कारण विचारले असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी गेटसमोरच आरजीपीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून निषेध केला.
पिंडदानाकरवी राखणदारांना आवाहन अखेर गेट खुली करण्यात आली नसल्याने आरजीपीच्या कार्यकर्त्यांनी टीसीपी खात्याच्या गेटसमोर पिंडदान करून जे कुणी गोव्याच्या विनाशाला जबाबदार असतील तसेच विनाशकारी प्रकल्पांना मंजुरी देत असतील त्यांना अद्दल घडविण्याचे आवाहन राज्यभरातील राखणदारांना करण्यात आले. या विनाशी वृत्तीचा निकाल या वर्षभरात लागू द्या, असेही आवाहन त्यांनी केले.





