विरोधक ”अवतार” घेणार?

आता पुढील निवडणुकीस केवळ एक वर्षांचा कार्यकाळ राहिल्याने त्यांना आपल्या मूळ विरोधकांच्या भूमिकेत परतणे भाग आहे; अन्यथा त्यांच्या या कार्यकाळाचा अवतार संपुष्टात येईल, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

गोवा विधानसभेचे पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवार, १२ जानेवारीपासून सुरू होत आहे. जिल्हा पंचायती पूर्णपणे काबीज करण्याचा भाजपचा संकल्प काही प्रमाणात फोल ठरला आहे. नगर नियोजन खात्याच्या भूरूपांतरांवरून संपूर्ण गोवा खवळलेला आहे. भ्रष्टाचाराने परिसीमा ओलांडली आहे. प्रशासनाने लोकसेवा पूर्णपणे सोडून सरकार आयोजित इव्हेंट व्यवस्थापनात स्वतःला गुंतवून ठेवले आहे. अशा परिस्थितीत या अधिवेशनात विरोधक नेमके सरकारला कसे धारेवर धरतात आणि सरकार या सगळ्या गोष्टींना पुरून उरून अधिवेशनाच्या चक्रव्यूहातून स्वतःची सुटका कशी करून घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नव्या वर्षाचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे पहिल्या दिवशी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचे अभिभाषण होणार आहे. सरकार लिखित अभिभाषण राज्यपालांकडून वाचले जाते, हे खरे असले तरी ते लिहिताना राज्यपालांच्या पदाची प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्याची जबाबदारी सरकारची असते. राज्य सरकार नेमके राज्यपालांच्या हाती कोणते भाषण देते आणि राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचे पहिले अभिभाषण गोंयकारांच्या मनाला कितपत स्पर्श करते, हे सोमवारी स्पष्ट होईल.
पणजीत आयोजित जन आंदोलन सभेतील १० मागण्यांचा जाहीरनामा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पोहोचला आहे. निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी स्वतः भेट घेऊन हे विषय सरकारकडे पोहोचवले आहेत. या मागण्यांचा निश्चितच विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले आहे. या विधानसभेत सहजिकच नगर नियोजनाच्या भूरूपांतरांवर, हडफडे दुर्घटनेवर तसेच किनारी भागातील बेकायदा पार्ट्या आणि अनिर्बंध उच्छादावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात नगर नियोजन मंत्री अधिकाधिक लक्ष्य होण्याची शक्यता सरकार किंबहुना मुख्यमंत्री पाहत आहेत काय, असा प्रश्न पडतो. चर्चेनंतर जर हा कायदा किंवा डोंगरकारणीसंबंधी नगर नियोजन खात्याचा आदेश सरकारने मागे घेतला, तर ती नगर नियोजन मंत्र्यांसाठी लांच्छनास्पद गोष्ट ठरेल. अधिवेशनापूर्वीच जनभावनांचा आदर राखून ही वादग्रस्त कलमे मागे घेण्याची घोषणा होणे अपेक्षित आहे; तसे झाले नाही तर सरकार कुठल्याच पद्धतीने आपला निर्णय मागे घेणार नाही, असा अर्थ त्यातून अधोरेखित होतो.
सरकारने प्रशासनाला जणू एखाद्या राजाच्या खाजगी कर्मचाऱ्यांचा लवाजमा असल्याचे रूप दिले आहे. सर्व कर्मचारी कुठल्या ना कुठल्या इव्हेंट किंवा कार्यक्रमात व्यस्त असतात. सगळीकडे कार्यक्रमांची रेलचेल आहे. प्रशासन, लोकांची कामे, प्रशासकीय सेवा यांना कुणीच वाली नाही. प्रत्येक साध्या गोष्टीसाठी आमदार किंवा मंत्र्यांकडे जाऊन तिथून फोन करून कामे करून घेण्याची एक अलिखित पद्धत जाणीवपूर्वक तयार करण्यात आली आहे. हे सगळे काही नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. लोकांना आपण या जाळ्यात अडकतो आहोत, हेच समजेनासे झाले आहे. मात्र या सगळ्या गोष्टींची जाणीव झाल्यानंतर जनता नेमका कसा प्रतिकार करेल, हे सांगता येत नाही.
गेल्या चार वर्षांत सरकारशी चांगले संबंध ठेवून आपल्या मतदारसंघातील बारीकसारीक कामे करून घेण्याकडेच विरोधकांचा कल दिसतो. आमदार विजय सरदेसाई वगळता इतर सर्व आमदार हे पहिल्यांदाच निवडून आल्याने त्यांच्या मतदारांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हे करत असताना विरोधकांची नैतिकता ते विसरले आहेत. आता पुढील निवडणुकीस केवळ एक वर्षांचा कार्यकाळ राहिल्याने त्यांना आपल्या मूळ विरोधकांच्या भूमिकेत परतणे भाग आहे; अन्यथा त्यांच्या या कार्यकाळाचा अवतार संपुष्टात येईल, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    27/06/2026 e-paper

    27/06/2026 e-paper

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    गोव्यासमोरील मूक आपत्ती