रोहीतचा बंगला बने न्यारा !

शत्रूला पराभूत करता येत नसेल, तर त्याला मित्र बनवा, ही रणनीती भाजपच्या राजकीय यशाचे गमक ठरली आहे. त्यामुळे कुणाला काहीही वाटले तरी त्याचा फरक भाजपला पडत नाही.

ताळगावातील सर्वे क्रमांक १८६/३ या शेतजमिनीत सुरू असलेले बांधकाम हे आपल्या घराचेच असल्याचे धडधडीत स्पष्टीकरण पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात यांनी दिले. शेजारील शेतात कंत्राटदाराने टाकलेले बांधकाम साहित्य लवकरच साफ केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुळात आपल्या घराबाबत काहीच विषय नसताना काहीजण विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
ताळगावातील शेतात सुरू असलेल्या या वादग्रस्त बांधकामाबाबत एका पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला आणि अखेर अधिकृत स्पष्टीकरण मिळाले. रोहीत मोन्सेरात हे राज्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात आणि ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे सुपुत्र आहेत. ही जमीन रोहीत मोन्सेरात यांच्या नावे असली तरी ती ताळगाव कोमुनिदादची मूळ मालमत्ता आहे.
शेतजमिनीशी संबंधित कृषी कुळ कायद्यानुसार विकत घेतलेली जमीन दुसऱ्याला विकता किंवा कराराने देता येत नाही, त्यामुळे कायद्यानुसार रोहीत मोन्सेरात या जमिनीचे कायदेशीर मालक कसे झाले, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. तसेच, नगर नियोजन विभागाकडून घर बांधण्यासाठी शेतजमिनीचे ‘सेटलमेंट’ करून परवानगी घेतली आहे का आणि महसूल विभागाने त्यासंबंधीची सनद दिली आहे का, यावरही सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवे.
ताळगावची ही जमीन भातशेतीसाठी राखीव असून कृषी धोरण आणि शेतीसंरक्षण कायद्यात तशी तरतूद आहे. मात्र, रोहीत मोन्सेरात यांना या प्रकरणी विशेष सवलत देण्यात आली आहे का, हे सरकारने स्पष्ट करणे आवश्यक आहे.
या प्रकरणावर एकही विरोधक आवाज उठवत नाही. आपचे फ्रान्सिस कुएलो, सेसिल रॉड्रीगिस वगळता पणजी किंवा ताळगावच्या नागरिकांनी सरकारला जाब विचारला नाही, ही बाब विचार करण्यासारखी आहे. ताळगांव कोमुनिदादचे काही गांवकार याविरोधात प्रशासकीय आणि न्यायालयीन लढा लढत आहेत परंतु त्यांना राजकीय व्यवस्था साथ न देता त्यांचीच सतावणूक करत असल्याचेही पाहणीत आले आहे. मोन्सेरात कुटुंबाच्या राजकीय प्रभावामुळे भाजपने त्यांच्यापुढे शरणागती पत्करली आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतो. गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपला मोन्सेरात यांची घराणेशाही काहीच वाटत नाही का?
शत्रूला पराभूत करता येत नसेल, तर त्याला मित्र बनवा, ही रणनीती भाजपच्या राजकीय यशाचे गमक ठरली आहे. त्यामुळे कुणाला काहीही वाटले तरी त्याचा फरक भाजपला पडत नाही. राजकारणात मते कशी मिळवायची आणि निकालानंतर बहुमत कसे मिळवायचा याचा फॉर्म्यूलाच भाजपला गवसल्यामुळे जनतेच्या कुठल्याच विषयाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज नाही, असेच अप्रत्यक्ष धोरण भाजपने स्वीकारलेले आहे हे मात्र नक्की.

  • Related Posts

    पंचायत खात्यावर कारवाई कधी?

    जोपर्यंत पंचायत खात्याच्या मुळाशी जाऊन या भ्रष्टाचाराचे मूळ उखडले जाणार नाही, तोपर्यंत भ्रष्टाचाराची ही वाढलेली वेल ढेचली जाणार नाही, हे तितकेच खरे आहे. हडफडेतील बर्च बाय रिमोओ लेन अग्निकांड प्रकरणी…

    आरोग्याचे राजकारण

    मुख्यमंत्री आणि आमदार एकीकडे तर आरोग्यमंत्री दुसरीकडे अशी अवस्था आहे आणि त्यामुळे अशा अधिसूचनांवर किती विश्वास ठेवावा हा खरा प्रश्न आहे. पेडणे तालुक्यातील तुये येथे सुमारे शंभर कोटी रुपये खर्च…

    You Missed

    23/01/2026 e-paper

    23/01/2026 e-paper

    आसगांव पंचायतीचा खात्याला दणका

    आसगांव पंचायतीचा खात्याला दणका

    पंचायत खात्यावर कारवाई कधी?

    पंचायत खात्यावर कारवाई कधी?

    22/01/2026 e-paper

    22/01/2026 e-paper

    भाजपच्या सामन्यास युवा काँग्रेस सज्ज

    भाजपच्या सामन्यास युवा काँग्रेस सज्ज

    आरोग्याचे राजकारण

    आरोग्याचे राजकारण