सावियो रॉड्रिगीस यांचे स्पष्ट संकेत
गांवकारी, दि.१० (प्रतिनिधी)
हडफडे येथील दुर्दैवी अग्निकांडात २५ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारी व प्रशासकीय पातळीवरील भोंगळ कारभार उघडकीस आल्यामुळे लवकरच केंद्रीय स्तरावरून गोवा सरकार आणि पक्षात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या व सुधारणा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य तसेच भाजपच्या विचार विभागाचे घटक सावियो रॉड्रिगीस यांनी गांवकारीला दिलेल्या विशेष मुलाखतीत याबाबत स्पष्ट संकेत दिले. हडफडे दुर्घटनेने राज्यातील भ्रष्टाचार, प्रशासकीय बेफिकीरी, निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणाचा पर्दाफाश झाला आहे. लुथ्रा बंधूंवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहेच; परंतु त्यांच्या आडोशाने सरकारातील घटक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आपले तोंड लपवू नये, असेही श्री. रॉड्रिगीस यांनी सांगितले.
या घटनेतून सरकार काहीतरी बोध घेईल आणि तत्काळ चुकांची दुरुस्ती करेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. लुथ्रा बंधूंना नेमका कुणाचा आशीर्वाद होता, ज्यामुळे आवश्यक परवाने नसतानाही त्यांनी बिनधास्त व्यवसाय केला? घटनेच्या दिवशीच रात्री उशिरा त्यांनी देशातून पलायन केले, यावरून केवळ राजकीयच नव्हे तर प्रशासकीय पातळीवर राज्य व केंद्रातही त्यांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट होते, असे सावियो रॉड्रिगीस यांनी नमूद केले.
दिल्लीत बॅगा पोहोचतात काय, माहित नाही
राज्यात नगर नियोजन, पर्यटन किंवा गृह खात्याशी संबंधित व्यवहारांना दिल्लीतून पूर्ण आशीर्वाद मिळतो. या व्यवहारातूनच कोट्यवधी रुपये दिल्लीत पाठवले जातात, अशी जनतेत चर्चा आहे. याबाबत विचारले असता सावियो रॉड्रिगीस म्हणाले, “अशी गोष्ट किमान मला तरी माहित नाही.” भाजपच्या खात्यात सर्वाधिक पैसा आहे, त्यामुळे गोव्यासारख्या राज्यातून पैशांची अपेक्षा केली जाणे पटत नाही. हा पैसा स्थानिकांकडेच साठवला जातो आणि दिल्लीच्या नावावर खपवला जात असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पक्षाचा हितचिंतक म्हणून चुकीच्या गोष्टींवर पांघरूण घालण्याचे काम आपण करणार नाही. देश आणि राज्य हेच आपले प्राधान्य आहे. देशाला व राज्याला अशोभनीय अशा गोष्टींवर आपण सडेतोड भाष्य करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेले निर्णय व धोरणे अत्यंत महत्त्वाची आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जनतेच्या जाहीरनाम्याला पाठींबा
निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी मुख्यमंत्र्यांना जनतेचा जाहीरनामा सादर केला आहे. या मागण्यांना आपला पाठींबा असल्याचे सावियो रॉड्रिगीस यांनी स्पष्ट केले. सरकार किंवा पक्ष जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही. जनतेने आपल्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊन त्या सुधारण्यास भाग पाडले पाहिजे.
जनता बेफिकीर आणि निष्काळजीपणे वागणार, आणि आम्ही सरकार व पक्षाकडून अपेक्षा ठेवणार, याला काहीच अर्थ नाही. जनतेनेच गोव्यासाठी मारक ठरणाऱ्या नेत्यांना अद्दल घडवली पाहिजे, तरच ही परिस्थिती सुधारेल, असे सावियो रॉड्रिगीस यांनी ठामपणे सांगितले.






