२ ऑक्टोबर म्हटले की आपल्याला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री आठवतात. पण मला या दिवशी आणखी एक नाव आठवते राजाराम रंगाजी पैंगिणकर !
आज त्यांची जयंती नाही, की पुण्यतिथी नाही. आज त्यांच्या संघर्षाचा दिवस !
आजच्याच दिवशी, म्हणजे २ ऑक्टोबर १९१० साली, त्यांनी गोव्यातील देवदासी प्रथेविरुद्ध पहिली सभा घेतली होती. राजाराम हे पैंगिण या दक्षिण गोव्यातील एका खेडेगावातील तरुण. त्यांनी लोकमान्य टिळकांचा केसरी पोस्टाने मागवला. केसरीचा अंक तर राजारामला पोचला, पण त्यावरील पत्त्यात नाव लिहिताना त्यांनी वडिलांचे नाव लिहिले होते. म्हणून त्यांचे वडील त्यांच्या आईशी भांडायला आले. “राजाराम बापाचे नाव म्हणून आपले नाव का लावतोय?” कारण राजाराम ‘ठेवलेल्या बाईचा मुलगा’ होता.
राजारामजी म्हणतात, “हे माझे वडील आहेत हे अख्ख्या गावाला माहित आहे. राजरोसपणे ते माझ्या आईकडे येतात. पण बाप म्हणून नाव लावायला मात्र आक्षेप घेतात. मग मी कोण?”
काय वेदना झाल्या असतील वीस वर्षांच्या राजारामजींना! किती घुसमट झाली असेल त्यांची! त्यांच्या जागी स्वतःला कल्पून एकदा विचार करून बघा काय भयानक असते औपचारिक बाप नसणे!
त्यानंतर एकदा ते कामानिमित्त काणकोणच्या मामलेदाराच्या कचेरीत गेले होते. काम व्हायला उशीर लागणार म्हणून बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर ते बसले. त्यांना बाकड्यावर बसलेले पाहून आतला कारकून बाहेर आला आणि म्हणाला, “बाकड्यावर बसू नकोस. खाली बस. औकातीत रहा.”
किती भयानक अपमान वाटला असेल राजारामजींना!
राजारामजी संतापाने तेथून निघून गेले, पण जाताना म्हणाले, “एक दिवस असा येईल की आम्ही तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसू.”
अपमानानंतर अनेकजण असे बोलून जातात. पण पैंगिणकर नुसतेच बोलले नाहीत. त्यांनी त्यांचा संताप वाया जाऊ दिला नाही. त्यांनी देवदासी प्रथेविरुद्ध लढा उभा केला. त्या लढ्याचा पहिला एल्गार पहिली सभा आजच्याच दिवशी, ११५ वर्षांपूर्वी झाली. आणि पैंगिणकरांनी सुरू केलेल्या लढ्याची परिणती कशात झाली, माहिती आहे? गोव्याचे पहिले मुख्यमंत्री देवदासी समाजातील होण्यात झाली!
पैंगिणकर म्हणतात, “खुर्चीला खुर्ची लावून बसू म्हटले होते, पण आज खुर्चीला खुर्ची नाही गोव्याच्या सर्वोच्च खुर्चीवर आमचा माणूस विराजमान झाला!”
- संकलन: डॉ. रुपेश पाटकर







