युद्ध नको मज बुद्ध हवा !

भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे, आणि यावेळीही कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे.

युद्ध हे नेहमीच अंतिम पर्याय असते, परंतु ते कधीही समाधानाचे साधन नसते. इतिहासाच्या पानांवर रक्ताचे शिंतोडे उडवणाऱ्या अनेक संघर्षांचा मागोवा घेतला तर लक्षात येते की युद्धाने केवळ विनाशाची भाषा बोलली आहे, मानवी जीवनाचा संहार, अर्थव्यवस्थेचे पतन, आणि पर्यावरणीय संकटे. भारत आणि पाकिस्तान हे अण्वस्त्रधारी देश आहेत, त्यामुळे जर युद्धाचा मार्ग निवडला गेला, तर त्याचे परिणाम भयंकर आणि दीर्घकालीन असू शकतात. युद्ध केवळ रणांगणावरच लढले जात नाही, तर प्रत्येक घरात त्याचा परिणाम जाणवतो.
सैनिक युद्धभूमीवर जात असताना त्यांच्या कुटुंबीयांचे मन अशांत होते. आर्थिकदृष्ट्या, युद्धाने राष्ट्राची प्रगती थांबते, संसाधनांचा नाश होतो, आणि नागरिकांवर करांचा भार वाढतो. युद्धाच्या राखेत केवळ राष्ट्रांचे स्वप्ने जळून जातात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यास अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, आणि त्यामुळे संपूर्ण उपखंड संकटात सापडू शकतो. अण्वस्त्रांची ताकद हे संरक्षणाचे अंतिम अस्त्र असते, परंतु त्याचा वापर विनाश घडवतो. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. शांततेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जागतिक दबाव आणि कूटनीती ही प्रभावी अस्त्रे ठरू शकतात.
भारत सतत दहशतवादाचा शिकार होत आहे. विनाकारण सामान्य नागरिक आणि भारतीय सैन्यदल दहशतवादाचे बळी ठरत आहेत. मात्र, युद्ध हा दहशतवादाचा पूर्णविराम असू शकत नाही. दहशतवादाचा मुकाबला कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. जागतिक दबाव, आर्थिक निर्बंध आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कठोर धोरणांद्वारे दहशतवाद्यांना निष्प्रभ करणे हा अधिक प्रभावी मार्ग आहे. युद्धाने दहशतवादाचा सामना होत नाही, उलट त्याला अधिक बळ मिळते. युद्ध म्हणजे घरी बसून सोशल मीडियावर चर्चा करण्याचा विषय नाही. युद्धासाठी मानसिक तयारी आवश्यक असते. देशाच्या नागरिकांनी त्याचा सामना करण्यास तयार असले पाहिजे.
युद्धामुळे रोजगार, व्यापार, शिक्षण आणि आरोग्यसेवा यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे युद्धाची किंमत केवळ रणांगणावर मोजली जात नाही, तर ती संपूर्ण समाजाने भरावी लागते. भारत हा जगाच्या नकाशावर एक महत्त्वाचा देश आहे. अनेक आंतरराष्ट्रीय देशांची मोठी बाजारपेठ म्हणून भारताची भूमिका अधिक निर्णायक आहे. युद्धामुळे भारताच्या जागतिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक अडचणी उद्भवू शकतात. भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे, आणि यावेळीही कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे भविष्य एकमेकांशी युद्धाने ठरणार नाही, तर संवादाने ठरते. शस्त्रांनी जिंकलेली लढाई तात्पुरती असते, पण बुद्धीने मिळवलेला विजय कायमस्वरूपी असतो.
सामंजस्य आणि मुत्सद्देगिरी हे युद्धाला पर्याय असू शकतात, फक्त इच्छाशक्ती लागते. शांतता ही कणखर नेतृत्वाने मिळते, भावनिक निर्णयांनी नव्हे. युद्धाच्या शस्त्रांनी निर्माण होणारा विनाश टाळून, शांतता आणि प्रगतीसाठी कूटनीतीचा मार्ग निवडणे हेच अधिक शहाणपणाचे ठरेल. भारताने जगाच्या हिताचे आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भक्कम पावले उचलली पाहिजेत. शांतता हा कमकुवतपणा नाही, तर तो वास्तववादी दृष्टिकोन आहे.

  • Related Posts

    एक भारत, श्रेष्ठ भारत !

    देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना भावनिक आधार मिळाला, तर प्रत्येक घरातून देशासाठी समर्पणाची भावना वाढीस लागेल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर भारताने दिल्यामुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली आहे. प्रारंभी…

    हे काय चाललंय ?

    विल बनावट असल्याचे सिद्ध होऊनही पोलिस संशयिताला अटक करत नाहीत. उलट तक्रारदारांना न्यायालयात जाऊन आदेश मिळवावा लागतो आणि तरीही अटक न करता त्याला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मदत केली जाते. सरकारी…

    One thought on “युद्ध नको मज बुद्ध हवा !

    1. भारताने शांततेचा मार्ग नेहमीच अवलंबला आहे, हे खूपच महत्त्वाचे आहे. कूटनीतीचा वापर करून संघर्ष टाळणे हे योग्य धोरण आहे. युद्ध हा नेहमीच अंतिम पर्याय असतो, पण तो कधीही समाधानाचे साधन नसतो. शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असते. गोव्यात आयएएस अधिकाऱ्यांची फौज असताना त्यांच्या प्रशासनाचा लोकसेवेला काय फायदा होतो?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बनावट विल; सत्तरी उपनिबंधक गप्प का?

    बनावट विल; सत्तरी उपनिबंधक गप्प का?

    रवी नाईक – आगे बढ़ो!

    रवी नाईक – आगे बढ़ो!

    10/05/2025 e-paper

    10/05/2025 e-paper

    09/05/2025 e-paper

    09/05/2025 e-paper

    एक भारत, श्रेष्ठ भारत !

    एक भारत, श्रेष्ठ भारत !

    दाडाचीवाडी जमिनीच्या ‘डील’चा सुत्रधार कोण?

    दाडाचीवाडी जमिनीच्या ‘डील’चा सुत्रधार कोण?
    error: Content is protected !!