
विशेषतः धार्मिक उत्सवांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांमध्ये नेहमीच सर्वसामान्य भाविक बळी पडतात, तर व्हीआयपी किंवा अतिविशेष व्यक्तींना कधीच हानी पोहोचल्याचे दिसत नाही.
आजच्या परिस्थितीत धर्मासंदर्भात विचार मांडला की लगेच धर्मांध विचारसरणी असलेले लोक विरोध दर्शवतात. धार्मिक बाबतीत काही सूचना किंवा सल्ला देण्याचा प्रयत्न केला तरी सरळ फटकारले जाते आणि “तुम्हाला काहीच कळत नाही” असे म्हणून गप्प केले जाते.
“देवाचा सण किंवा उत्सव असल्याने तिथे काहीच गैर होणार नाही, देव सगळे ठिक करून घेईल” असा दावा करून अनेकदा जबाबदारी झटकली जाते. मात्र, दुर्घटना घडल्यास त्याला देवाचा कोप किंवा अंधश्रद्धेचा आधार मिळतो. विशेष म्हणजे अशा धार्मिक उत्सवांत सर्वसामान्य भाविकच बळी पडतात, तर कोणताही अतिविशेष किंवा व्हीआयपी व्यक्ती नुकसान झाल्याचे कधी दिसत नाही.
गोव्याच्या धार्मिक आणि अध्यात्मिक वारशाचे प्रतीक म्हणून शिरगांवच्या श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवाला महत्त्व आहे. यात धोंडभक्त देवीस वाहून घेऊन भक्ती व्यक्त करतात. यासोबत साळ डिचोली येथील गडेत्सवही महत्त्वाचा मानला जातो. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतून लाखो भाविक या उत्सवांना येतात. संकटांवर मात करण्याचा कोणताही ठोस उपाय उपलब्ध नसल्याने देवकृपा हीच आशा वाटते. यामुळेच लाखो भाविक शिरगांवच्या देवीला शरण जातात.
मात्र, इतक्या मोठ्या संख्येच्या भाविकांची जबाबदारी केवळ देवस्थान समितीवर टाकून भागणार नाही. यासाठी सरकारच्या प्रभावी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. शिरगांवच्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने सरकार हे व्यवस्थापन करत आले आहे, पण तो केवळ औपचारिकतेपुरता आहे की गंभीरपणे घेतला जातो, याबाबत चर्चेची गरज आहे.
शनिवारी पहाटे शिरगांवात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला आणि २२ जण जखमी झाले, त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून संपूर्ण गोवा हादरला आहे. श्री लईराईची महती जात आणि धर्माच्या पलिकडची असल्यामुळे ही दुर्घटना सर्व गोमंतकीयांसाठी हेलावणारी आहे. या घटनेला जबाबदार कोण याचा शोध घेताना केवळ देवस्थान किंवा सरकारी यंत्रणेच्या अपयशावर बोट ठेवून चालणार नाही. भाविक म्हणून आपलीही जबाबदारी आहे.
जत्रोत्सवात धोंडभक्तांना विशेष मान आणि आदर असतो हे जरी बरोबर असले तरी काहीजण या मानाचा दुरूपयोग करतात. त्यांच्या डोक्यात काय असते हे कळत नाही पण जत्रोत्सवातील इतर भाविकांना ते अडथळा, अडचण किंवा त्रासदायक असेच वागवताना दिसतात. आता तसे म्हणायचे झाले तर लाखोंच्या संख्येची गर्दी आणि त्यात मर्यादित जागेमुळे लोकांनाही या परिसरात वावरताना मर्यादा येतात मग अग्निदिव्याकडे मार्गस्थ करणाऱ्या आणि पावित्र्य जपण्याचे बंधन असलेल्या धोंड भक्तांना ही अडचण वाटणे हे देखील स्वाभाविक आहे.
यामध्ये समतोल साधण्यासाठी देवस्थान आणि प्रशासनाने उचित व्यवस्था करणे आवश्यक आहे. जर आपण केवळ धर्मांधळे होत वागत असू आणि विवेक बाजूला ठेवत असू, तर अशा दुर्घटना घडणे अटळच आहे. धर्माच्या जोपासनेत विवेक महत्त्वाचा आहे. विवेकाची जोड दिल्यास अनेक समस्या सुटू शकतात. केवळ अंधश्रद्धा आणि कट्टर विचारसरणीच्या आधारावर समाज पुढे जाऊ शकत नाही, याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.