जेनिटोचा आश्रयदाता कोण ?

जेनिटो आणि सरकारमधील एका राजकीय नेत्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. भाजपने यापूर्वी हे उघड केले असून, त्यामुळे या संबंधांचे रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाशी काही संबंध आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राजकीय आश्रयाशिवाय कोणताही गुंड अधिक काळ आपला डेरा शाबूत ठेवू शकत नाही. राजकीय पाठबळ मिळाल्यावर पोलिसांचे अभय आपोआप मिळते आणि त्यातूनच गुंड–राजकारणी–पोलिस अशी साखळी तयार होते. अशा गुंडांना आश्रय देणारे नेते नेहमीच सत्तेच्या बाजूने राहण्यासाठी धडपडत असतात. सत्तेत राहिल्यावरच त्यांना ही यंत्रणा टिकवून ठेवणे शक्य होते; अन्यथा हा डोलारा कोसळण्याची शक्यता असते. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात गोव्यातील गुन्हेगारी जगतातील अव्वल गुन्हेगार जेनिटो कार्दोझो याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील प्रमुख दहा गुन्हेगारांमध्ये अग्रस्थानी असलेल्या जेनिटोला पोलिसांनी अटक केल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. या प्रकरणामुळे अनेकांनी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या कार्यकाळातील गुंडांविरोधातील कारवाईची आठवण केली. मुख्यमंत्र्यांनी ती आठवण पुसून टाकत जेनिटोच्या अटकेद्वारे आपल्या धाडसाची नोंद घेतली, असे अनेकांचे निरीक्षण आहे. जेनिटोला अटक झाली की तो शरण आला, असा सवाल काही निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित करत आहेत. जेनिटोला राजकीय आश्रय आहे, हे सर्वश्रुत आहे. त्याचा राजकीय गॉडफादर कोण, याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. रामा काणकोणकर याचे जेनिटोकडे नेमके कोणते वैयक्तिक शत्रुत्व होते? कदाचित रामा काणकोणकर यांचा सामाजिक लढा एखाद्या राजकीय नेत्याला अडचणीचा वाटला असावा आणि त्याचा वचपा काढण्यासाठीच जेनिटोमार्फत हा हल्ला घडवून आणला गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेनिटोने हल्ला केला असला तरी या हल्ल्याचा खरा मास्टरमाईंड कुणीतरी वेगळाच आहे, अशी चर्चा सुरू आहे. जेनिटो हा गोव्यातील गुन्हेगारी जगतातील डॉन मानला जातो. त्याची एट, जीवनशैली आणि राहणीमान हेवा वाटावा असे आहे. राज्यातील किनारी भागातील मोठ्या हॉटेल्स आणि पर्यटन आस्थापनांकडून खंडणी गोळा करण्याची जबाबदारी जेनिटोकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजकीय नेत्यांसाठी खंडणी गोळा करणाऱ्या जेनिटोला सरकार रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात खरोखरच आरोपी ठरवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. जेनिटोला अटक केल्यानंतर पोलिस या प्रकरणाची नेमकी काय कथा तयार करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे, रामा काणकोणकर यांनी अद्याप पोलिसांना जबानी दिली नसल्याचे वृत्त आहे. त्यांची जबानी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. रामा काणकोणकर यांची जेनिटोसोबत दुश्मनी असेल, तर ती कोणत्या कारणावरून आणि नेमके काय घडले, हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे. अशी माहिती उघड होणे अनेकांसाठी अडचणीचे ठरू शकते. पोलिस हे प्रकरण जेनिटोभोवतीच गुंडाळण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी एक राजकीय मास्टरमाईंड असल्याची चर्चा आहे, जी पोलिस आणि सरकारकडे वळवण्याचा प्रयत्न होत आहे. जेनिटो आणि सरकारमधील एका राजकीय नेत्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. भाजपने यापूर्वी हे उघड केले असून, त्यामुळे या संबंधांचे रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाशी काही संबंध आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात झटपट कारवाई केली, हे कौतुकास्पद आहे. मात्र ही कारवाई केवळ लोकांचा रोष टाळण्यासाठी मर्यादित राहू नये. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली, तरच या कारवाईला खरे महत्त्व प्राप्त होईल. पोलिस हे आव्हान स्वीकारतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President