काँग्रेसला शहाणपण सूचेल?

काँग्रेसने आपल्या वर्चस्वाच्या जुन्या इतिहासाच्या गंजलेल्या आठवणींना कितीही उजाळा देण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना पुन्हा एकहाती सत्ता मिळणे शक्य नाही हे त्यांनी जाणले पाहिजे.

भाजपचे २८, मगोपचे दोन आणि तीन अपक्ष मिळून ३३ आमदारांचा पाठींबा असलेल्या भाजप आघाडीला जिल्हा पंचायत निवडणुकीत ३३ जागा प्राप्त झाल्या. १७ ठिकाणी विरोधकांनी यश संपादन केले, ही आकडेवारी भाजपची चिंता वाढवणारी ठरली आहे. काँग्रेसला नेस्तनाबूत करणे हे भाजपचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी २०२० मध्ये फक्त ४ ठिकाणी विजयी ठरलेली काँग्रेस आता १० आकड्यांवर पोहोचली आहे. अर्थात, यातील ७ जागा या केवळ सासष्टीतील आहेत, ही जमेची बाजू आहे.
सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी सासष्टीचे काँग्रेस आमदार फुटून भाजपामध्ये सामील होऊ शकतात, हे भाजपने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे भाजपला त्याची चिंता नसेल. भाजपसमोर एकच आव्हान उभे राहणार आहे ते म्हणजे कुठल्याही परिस्थितीत विरोधकांची एकजूट होऊ नये. त्यासाठीची सगळी शक्कल भाजप लढवणार आहे, हे निश्चित.
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आघाडीने यश मिळवले असले तरी निकालांतून विरोधकांच्या मतविभागणीचा फायदा सत्ताधारी गटाला झाला, हे सर्वश्रुत आहे. विरोधक एकत्र आल्यास भाजपला अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतील. विरोधकांना कायम विभागून ठेवणे आणि त्यांना एकत्र येण्यापासून रोखणे यासाठी भाजपला आपली कूटनीती आखावी लागणार आहे. विरोधकांच्या दुखऱ्या नसा पकडल्या की ते विरोधात राहूनच भाजपसाठी काम करतात, हे वारंवार दिसून आले आहे. अशा दुखऱ्या नसा असणारे अनेकजण विरोधात असल्यामुळे या कूटनीतीचा उपयोग भाजप कशा प्रकारे करतो आणि विरोधकांना विस्कळीत ठेवून २०२७ मध्ये यश मिळवतो, ही त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाची रणनिती ठरणार आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची सोशल मीडियावरून माफी मागितली. “आघाडी होऊ शकली नाही म्हणून नैराश्य आले आणि त्यातून हे शब्द तोंडातून निघाले” असे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले. मनोज परब यांचा आक्रमक स्वभाव आणि काही प्रमाणात होणारी हेकेखोरी पाहता त्यांनी जाहीर माफी मागून आपल्या स्वभावाला मुठमाती देण्याचा प्रयत्न केला, असे दिसते. त्यांनी विरोधकांत एक सकारात्मक संदेश पाठवला आहे. “झाले गेले गंगेला मिळाले, किमान आता तरी चुकांतून काहीतरी बोध घेऊन पुढे जाऊ” असेच त्यांच्या कृतीतून दिसते.
आता विरोधक त्यांचा हा पवित्रा कसा घेतात, हे महत्त्वाचे आहे. कदाचित मनोज परब यांच्या थिवी मतदारसंघात काँग्रेसने यश मिळवले आहे. त्यांचा प्रभाव तिथे दिसला नाही म्हणून त्यांनी शरणागती पत्करली, असा अर्थ अनेकांनी लावला आहे. ते काहीही असले तरी शरणागती पत्करणे ही मोठी गोष्ट आहे आणि त्याचा सकारात्मक विचार विरोधकांनी करणे अपेक्षित आहे.
आरजीपीने विविध मतदारसंघात मिळवलेल्या मतांकडे काँग्रेसला दुर्लक्ष करता येणार नाही. गोवा फॉरवर्ड, आप काय करतील हे माहित नाही, परंतु आरजीपीसारख्या प्रादेशिक पक्षाशी काँग्रेसची युती झाली तरी त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. बिहारात भाजपने नितीश कुमार यांना जवळ केले. महाराष्ट्रात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतले. तेच धोरण काँग्रेसला स्वीकारावे लागणार आहे.
काँग्रेसने आपल्या वर्चस्वाच्या जुन्या इतिहासाच्या गंजलेल्या आठवणींना कितीही उजाळा दिला तरी त्यांना पुन्हा एकहाती सत्ता मिळणे शक्य नाही, हे त्यांनी जाणले पाहिजे. काँग्रेसला शहाणपण आले तरच भाजपला सत्तेपासून दूर करणे शक्य आहे.

  • Related Posts

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    काँग्रेसतर्फे राज्यपालांना निवेदन सादर गांवकारी,दि.२ (प्रतिनिधी) गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे बुधवारी राज्यपाल पी.एस.अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर निवेदन सादर करत तातडीने घटनात्मक हस्तक्षेप…

    चेकपोस्टच्या पोस्टिंगसाठी लाखोंच्या बोली ?

    आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांचा हल्लाबोल गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) राज्यातील वेगवेगळ्या सीमांवर वाहतूक खात्यातर्फे उभारण्यात आलेल्या आरटीओ चेकपोस्टवर पोस्टिंग मिळवण्यासाठी दर सहा महिन्यांनी लाखो रुपयांच्या बोली लावल्या जातात. सर्वाधिक…

    You Missed

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    02/07/2026 e-paper

    02/07/2026 e-paper

    मोफत शिक्षण आणि वास्तव ?

    मोफत शिक्षण आणि वास्तव ?

    GPCC Submits Memorandum to Governor, Seeks Urgent Intervention Over Goa’s Law and Order Situation

    GPCC Submits Memorandum to Governor, Seeks Urgent Intervention Over Goa’s Law and Order Situation

    01/07/2026 e-paper

    01/07/2026 e-paper

    सरकारची ‘म्हाजो फ्लॅट’ योजना जाहीर

    सरकारची ‘म्हाजो फ्लॅट’ योजना जाहीर