देवस्थान समितीने त्याच्या दहशतीला घाबरून हे स्वागत केले की त्याच्या तथाकथित पराक्रमी कारनाम्यांचा आदर म्हणून हा मान दिला, याबाबत संभ्रम आहे.
कुख्यात गुंड आणि सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझो हा काल म्हापशातील प्रसिद्ध राखणदार श्री देवी बोडगेश्वराच्या चरणी नतमस्तक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. राखणदारासमोर कुणीही नतमस्तक होऊ शकतो याबाबत कुणाचेच दुमत असू शकत नाही. मात्र जेनिटो कार्दोझो याला मिळालेले आदरातिथ्य, त्याचे स्वागत करून थेट राखणदाराच्या मूर्तीला स्पर्श करण्याची दिलेली मोकळीक पाहून अनेकांच्या मनात शंका-कुशंका निर्माण होणे साहजिकच आहे.
जेनिटो हा मुळातच कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले असून त्याबाबतचे खटले अद्याप सुरू आहेत. तो भाजपचा सक्रिय हितचिंतक असल्याचेही मानले जाते. बार्देश तालुक्यातील एका बड्या नेत्याचा तो खास हस्तक असल्याची चर्चा आहे. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे जेनिटो कार्दोझोच असल्याचा पोलिसांचा दावा आहे. अलिकडेच तो तुरुंगातून सुटला तेव्हा त्याचे जंगी स्वागत झाले आणि तो पार्टीत मश्गुल होता, हेही अनेकांनी पाहिले.
अशा गुंडाला राखणदाराच्या दरबारात मिळालेले आदरातिथ्य आणि व्हीआयपी वागणूक नेमकी कशासाठी होती, हा प्रश्न उपस्थित होतो. देवस्थान समितीने त्याच्या दहशतीला घाबरून हे स्वागत केले की त्याच्या तथाकथित पराक्रमी कारनाम्यांचा आदर म्हणून हा मान दिला, याबाबत संभ्रम आहे. गोरगरीब, सामान्य भक्तांच्या मदतीला धावणारा श्री देव बोडगेश्वर लोकांचे जीव घेण्याची सुपारी घेणाऱ्या किंवा हात-पाय मोडण्याची कंत्राटे घेणाऱ्या गुंडांचा तारणहार कसा काय ठरू शकतो, हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसला आहे.
हल्ली धर्माच्या नावाने सुरू झालेला धंदा आणि व्यापार पाहता धार्मिक पावित्र्य व नीतिमूल्ये मातीमोल होत चालली आहेत. ह्याच श्री बोडगेश्वराच्या जत्रौत्सवाला काहीजणांनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम व्यापाऱ्यांना परवाने देऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली. जायंट व्हिलच्या विषयावरूनही वादळ उठले. मुस्लीम व्यापाऱ्याच्या व्हिलला विरोध करून ते सील करण्यात आले, तर दुसरीकडे हिंदू व्यापाऱ्याला पाठींबा देण्यात आला. अखेर त्या मुस्लीम व्यापाऱ्याला परवानगी आणि हिंदू युवकाला आपला व्यवसाय बंद करावा लागला.
धार्मिक उत्सवांच्या या पार्श्वभूमीवर भावना, अध्यात्म किंवा श्रद्धेचा बाजार मांडून केवळ पैशांचा व्यवहार होत असल्याचे दिसते. श्रद्धेच्या भावनेला धक्का पोहोचल्याशिवाय राहत नाही. धार्मिक स्थळे किंवा मंदिरांत जर पैशांच्या ताकदीवरून भाविकाची गणना किंवा पत ठरत असेल, तर सामान्य भक्तांना हृदयातील भगवंतालाच नमस्कार करण्याची वेळ येईल हे निश्चित.






