कार्लूसबाब हे काय केलंत ?

आमदार कार्लूस फेरेरा यांचा भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान अनेकांना रूचलेला नाही. परंतु कार्लूस यांनी स्वतःच हा अपमान ओढवून घेतल्यामुळे त्याचा दोष त्यांनाच जातो, हे दुर्दैवाने खरे आहे.

‘माझे घर’ योजनेचा धडाका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लावला आहे. केवळ योजनेचे अर्ज वाटप करण्यासाठी लोकांची गर्दी खेचून आणून ज्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ते पाहता सनद वाटपावेळी काय झुंबड उडणार, याबाबत न बोललेलेच बरे.
हळदोणा मतदारसंघातील नास्नोळा पंचायत क्षेत्रात ‘माझे घर’ योजनेच्या कार्यक्रमात विरोधी काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लूस फेरेरा उपस्थित होते. या कायद्यांमध्ये त्यांनी विधानसभेत दुरुस्ती आणि बदल सुचवले होते, मात्र सरकारने ते विचारात घेतले नाहीत. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार होता. त्यावेळी पत्रकार परिषदेतून कार्लूस फेरेरा यांनी या योजनेवर सडकून टीका केली होती. तरीही सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी मोठा धोका पत्करला.
वास्तविक, त्यांच्या उपस्थितीची योग्य दखल सरकार, किंबहुना मुख्यमंत्री डॉ. सावंत घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भर लोकांसमोर अ‍ॅड. कार्लूस फेरेरा यांची धिंड काढून त्यांना अपमानित केले.
एरवी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फार संयमाने वागतात. ‘माझे घर’ योजनेची हवा त्यांच्या डोक्यात बरीच गेल्याचे त्यांच्या भाषणातून आणि आमदार कार्लूस यांना केलेल्या अपमानातून स्पष्ट झाले. या भाषणाची क्लिप बरीच व्हायरल झाली आहे. कदाचित ही क्लिप पाहून मुख्यमंत्र्यांनाही “हे करायला नको होते” असे वाटले असणे स्वाभाविक आहे.
आमदार कार्लूस यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला अपमान करून घेतलाच, पण काँग्रेस पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली. यापूर्वी कुडचडे येथे आमदार निलेश काब्राल यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाऊन त्यांच्या कामाचे कौतुक करण्याचा प्रकारही त्यांच्या कडून घडला होता. तो मतदारसंघ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा असल्याने त्यांनी यासंबंधी श्रेष्ठींकडे रीतसर तक्रारही दाखल केली होती.
आमदार कार्लूस फेरेरा यांचे हे वागणे पक्षासाठी अडचणीचे ठरत आहेच, पण त्यांच्या एकूणच राजकीय भूमिकेला मारक ठरत असल्याचे मत अनेकांचे बनले आहे. आपली गैरहजेरी भाजपच्या पथ्यावर पडेल आणि आपल्याविरोधात वातावरण तयार होईल, या भीतीने ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पण ते ज्येष्ठ वकील असल्याने आणि या कायद्यातील त्रुटी त्यांना माहिती असल्याने त्यांनी त्या जनतेसमोर मांडून, “हा कायदा खरोखरच अंमलात येईल का?” याबाबत आपली शंका सार्वजनिक करण्याचे धाडस दाखवायला हवे होते.
कायद्याच्या कसोटीवर हा कायदा खरा ठरला, तर निश्चितच सरकारचे कौतुकच करावे लागेल, असे म्हणून त्यांनी सरकारलाही चुचकारता आले असते. त्यांच्या एकूणच या कार्यक्रमातील वागणूक आणि हावभाव हे ‘बिनबुलाये मेहमान’ यासारखेच वाटत होते. त्यामुळे हळदोणा मतदारसंघातील त्यांचे कित्येक कार्यकर्ते आणि हितचिंतक नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
कायम विरोधी बाकांवर बसूनही सातत्याने निवडून येण्याचा मान अनेकांना मिळाला आहे. जनतेशी प्रामाणिक असणारा नेता सरकारच्या अशा कृत्यांना अजिबात घाबरत नाही. आमदार कार्लूस फेरेरा हे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. ते विरोधात आहेत आणि विरोधी आमदार या नात्यानेही चांगले काम करत आहेत. परंतु सरकारच्या अशा राजकीय डावपेचांना बळी पडून त्यांनी आपल्या प्रामाणिकपणालाच छेद दिला, तर मात्र हे त्यांच्यासाठी योग्य ठरणार नाही.
आमदार कार्लूस फेरेरा यांचा भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान अनेकांना रूचलेला नाही. परंतु कार्लूस यांनी स्वतःच हा अपमान ओढवून घेतल्यामुळे त्याचा दोष त्यांनाच जातो, हे दुर्दैवाने खरे आहे.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President