आमच्या हातात फक्त कुलदेवतेचा किंवा ग्रामदेवतेचा गंडा. त्यांच्या हातातले रंगीबेरंगी गंडे पाहिले की आमचाच बेरंग व्हायचा. मंदिरांना मोठ्या देणग्या, भव्य धार्मिक सोहळे, देवकृत्ये, भस्म आणि दुग्धाभिषेक—हे काही आम्हाला परवडणारे नाही. मग कुठल्या भरवशावर तोंड उघडून बोलायचं, हे तुच सांग.
खरंच अजिबात बोलू नका. कुणीतरी एकलं तर उगाच भानगड. मग हे नेते आपल्यावरच सूड उगवतात, नोकरीची बदली करतात, आमच्या मुलांना नोकरी नाकारतात, आमच्या बेकायदा गोष्टी शोधून काढतात आणि कारवाई करतात. मग उगाच कशाला बोलायचं?
पण हो, कुणीतरी बोलायलाच हवं. आहेत तर सोशल मीडियावर कायम बोंबा मारणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सडेतोड म्हणवणारे पत्रकार. ते आपल्याच मनातली खदखद बाहेर काढतात. त्यांच्या शब्दांनी थोडं समाधान मिळतं, पण देवा, जे काही चाललंय ते अगदीच चुकीचं आहे. हे असंच सुरू राहिलं तर आमच्या मुलांचं काय होणार?
आज जो तो पैशांच्या मागे हपापलेला आहे. पैसा असेल तरच किंमत, पैसा असेल तर अशक्य काहीच नाही. मग आम्ही काय करायचं रे देवा? तुझ्या भरवशावर पंगा घेतला तर ते तुलाच जास्त भावतात. आमच्या हातात फक्त कुलदेवतेचा किंवा ग्रामदेवतेचा गंडा. त्यांच्या हातातले रंगीबेरंगी गंडे पाहिले की आमचाच बेरंग व्हायचा. मंदिरांना मोठ्या देणग्या, भव्य धार्मिक सोहळे, देवकृत्ये, भस्म आणि दुग्धाभिषेक—हे काही आम्हाला परवडणारे नाही. मग कुठल्या भरवशावर तोंड उघडून बोलायचं, हे तुच सांग.
गोवा ही देवभूमी. परशुरामाचा पुतळा उभारून ह्यांनीच तर दाखवून दिलं. पण त्या पुतळ्याचं तोंड कॅसिनोंकडे. ही दिशा कुणी ठरवली असेल? महिने उलटले, परशुराम फक्त पाहत आहेत, पण परिणाम काहीच नाही. आता तर पर्तगाळीत प्रभू श्रीरामाचा भव्य पुतळा उभारून रामराज्य अवतरल्याची गर्जना झाली आहे. पण या रामराज्यात रावणांचाच भरणा आहे. प्रभू, या रावणांचा वध तू कधी करणार?
इथे पर्यटक सुख, आनंद, शांती आणि समाधानासाठी येतात. पण गोव्याने या शब्दांची मांडणी वेगवेगळ्या व्यवसायात करून पर्यटनात आंतरराष्ट्रीय ओळख बनवली आहे—स्वस्त दारू, ड्रग्ज, कॅसिनो, वेश्या आणि बरंच काही. म्हणूनच पर्यटकांच्या रांगा लागतात. लोकसंख्येपेक्षा पाचपट पर्यटकांची पावलं या भूमीवर पडतात आणि सरकारी तिजोरी भरभरून ओतते. ह्यात अनेकांचे खिसेही गरम होतात. मग कितीही जण मरू द्या, कितीही अग्नितांडव होऊ द्या—फरक पडत नाही. मृतांप्रती खेद, भरपाईची राशी जाहीर केली की सगळं संपलं. बाकी जन पळभर म्हणतील “हाय हाय…”
कारवाईचा बडगा उगारला. पण ज्यांचा नुकताच सन्मान केला, त्यांचंच निलंबन? इतकी बेपर्वाई हे अधिकारी करू शकतात तर मग ते या पदांवर बसण्यास पात्र आहेत का? मग निलंबन कशाला—थेट बडतर्फी का नाही? त्यांनी विवेकबुद्धीने केलंय की कुणाच्या तरी आदेशांचं पालन केलंय? हे अधिकारी खरंच दोषी की फक्त बळीचे बकरे?
दोतोर, गेली बारा वर्षे भाजपचं सरकार आहे. तुम्ही सूत्रं घेतलीत पाच वर्षांपूर्वी, पण प्रशासनात अजूनही शिस्त नाही. पोलिस फक्त तुमच्या आदेशानंतरच कारवाई करतात. प्रचारकाळात कोलवाळची जेल वाट पाहत होती, पण अजून कुणी पोहोचलेलं नाही. जेनिटोची सुटका होताच आतषबाजी झाली—पोलिसांची इज्जत कुठे राहिली?
बेकायदा गोष्टी उघड करणारे सामाजिक कार्यकर्ते तुमचे शत्रू. त्यांचा सन्मान करायचा सोडून त्यांनाच खंडणीखोर म्हणता. मग दाखवा ना कुठला कार्यकर्ता खंडणी घेऊन बंगले, गाड्या खरेदी करून एशारामात जगतोय. नाही तर राजकारणात आणि सत्तेत गब्बर पैसा मिळवून साधा शेतकरीही पंचतारांकित जगतोय, हे आम्ही दाखवतो.
पट्टेवाले अंधभक्त जमवून आणि सरकारी पैशांची उधळपट्टी करून अपयशावर पांघरूण घालून यशाचे मनोरे उभारले तरी ते कोलमडणारच. धर्माच्या अफुची गुंगी देऊन वास्तवापासून अंधभक्तांना दूर नेलं तरी अखेर वास्तवाशी भिडूनच शेवट होणार.
इतिहास सांगतो—कुंकळ्ळीच्या बंडात गेलेल्या हुतात्म्यांचा प्रतिशोध कुणी घेतला? पिंटोचे बंड रक्ताच्या थारोळ्यात मोडीत काढलं, पण गोंयकारांचे रक्त कधीच तप्त झालं नाही. गोवा मुक्ती संग्रामात उडी घेतलेल्यांना आत्ताच्या सामाजिक कार्यकर्त्यांसारखीच वागणूक मिळाली होती. तेव्हा समाज पोर्तुगीज शासनाच्या भीतीपोटी गप्प होता. पण आता तर आम्हीच निवडून दिलेलं सरकार सत्तेवर आहे. तरीही ही भीती कशाची?
पण काहीही असो—तुम्ही गप्प राहा. तोंड उघडू नका.
शु… शु… शु…!





